मुंबई : राज्यात करोनाचे संकट गंभीर असले, तरीदेखील जनतेला गांभीर्य नाही. त्यामुळे मोठया संख्येने नागरिक रस्त्यावर दिसत आहे. पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा. ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
‘करोना’च्या संकट काळात कर्तव्य बजावणार्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणार्यांवर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला आहे. राज्यात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ असला तरी दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरू आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजानं, स्वयंसेवी संस्थांनी पुढं यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढं आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक आहे. वसईत पोलीस अधिकार्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकार्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं ‘कोरोना’चं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं, पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकार बांधवाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तिथ माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित पत्रकारांना संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ‘ऑनलाइन’ संवाद साधून सुरक्षितता राखावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
लष्कर बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका ः उपमुख्यमंत्री